दिवस क्र. ९ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
३१ मार्च २०२०
जग थबकलंय. पण मन ही थबकलंय. रेल्वे, विमान, मालवाहू ट्रक, बसेस या सर्वांबरोबर कोणत्याही विषयावर दूरगामी विचार करण्याची किंवा नियोजन करण्याची मनःस्थिती नाही. वास्तविक हा टप्पा तात्पुरता आहे आणि याला शेवट आहे हे माहित असूनही असे का वाटते समजत नाही.
न्यू जर्सीहून किशोर गोरे या मित्राने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर आमच्या आजूबाजूची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमच्या घराच्या आसपास पाच-दहा कि.मीच्या परिसरात जवळजवळ पन्नास कोरोना रुग्ण आहेत. न्यूयॉर्क इथून अवघ्या ५० किमी वर आहे जिथं जवळजवळ २५००० जणांना लागण झाली आहे. देशातील ५०% हून अधिक रुग्ण न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्टिकट या तीन राज्यातील असून फक्त आज ५०० लोकांचा मृत्यू झाला. तीन आठवड्यापासून आम्ही घरात बंदिस्त आहोत. आणि आमच्या दोन्ही मुलींना भेटू शकलेलो नाही. अंकिताचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेय पण तिचा पदवीदान समारंभ रद्द झालाय. ती १ जुलै पासून रेसिडन्सी सुरु करणार होती पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती अशा रुग्णांच्या सेवेसाठी लगेच रुजू होण्याचे नियोजन करते आहे.”
अशाच प्रकारचे गंभीर चित्र ऑस्ट्रेलियातील छोट्या फिनिक्स मधून आलेल्या पत्रात प्रतिबिंबित आहे. त्या पोस्टमधली काही वाक्यं, ‘सध्या क्लिनिकमध्ये बाहेरचा आजार आत येऊ नये म्हणून शक्यतो रुग्णाला बाहेरच्या बाहेर निपटवणं चालू आहे. हॉस्पिटलमध्येहीकोणाला घेत नाहीत. अगदीच परिस्थिती बिघडली आणि व्हेंटिलेटर लागणार असेल तरच ऍडमिट करून घेताहेत.” (सौजन्य: आर्याबाग ग्रुप/मंगेश सपकाळ)
मी आणि पत्नी साधनाने आज ठरवले की एक तास कोरोना सोडून इतर विषयांवर बोलू. पाचच मिनिटात आम्हाला नकळत आम्ही पुन्हा कोरोनावर आलो. कुणीतरी गळ्याभोवती कोरोनाचा फास बांधतोय. मग दुसरा विषय कसा सुचणार? बाहेर आत टीव्ही वर व्हॉटसऍप वर फक्त हा ‘व्हायरस’ आहे. आज दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘तबलिग’ संस्थेच्या बेपर्वाईमुळे उद्भवलेल्या रुग्णांबाबत दाहिदिशानी चर्चा सुरु आहे.
Leave a Reply