दिवस क्र. ४ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
२६ मार्च २०२०
आता संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण देशच एवढंच काय संपूर्ण जग थबकल्याचा भास होतोय. घरासमोरच्या बागेत एकही व्यक्ती फिरताना भटकताना दिसत नाही. रस्त्यावरती वाहन अतिशय तुरळक. एका अर्थाने जग केवढं शांत व वारंवार प्रसन्न दिसतंय. दिल्लीत वसंताला सुरुवात झाली आहे. वातावरणात अजूनही एक हलका का असेना गारवा आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व बंद आहे. आधी राज्याच्या सीमा बंद. मग जिल्ह्याच्या बंद. आता तर गावोगावच्या सीमांवर नाकेबंदी सुरु आहे. अनेक गावांमध्ये मागच्या काही आठवड्यात गावात बाहेरून आलेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इतरांनी त्यांचा संपर्क करू नये त्याचप्रमाणे त्या व्यक्तीनी स्वतःचे विलगीकरण करावे हा या पाठीमागचा हेतू आहे.
काल केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. तिथंही सगळ्या खुर्च्या अंतर ठेऊन लावल्या होत्या. साहजिक आहे. प्रिन्स ऑफ वेल्स, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, कमलनाथ, यांच्या वार्ताहर परिषदेतील पत्रकार, कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी या सर्वाना संसर्ग झाला आहे आणि जर्मनीच्या एंजेला मर्केल पासून इंग्लंडच्या राणीपर्यंत सर्वानी विलगीकरण स्वीकारले आहे. याचा अर्थ हा संसर्ग कोणालाही सहज होऊ शकतो. फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना होण्याची शक्यता कमी आहे. ‘कोरोनापेक्षा मंदीमुळे अधिक लोक मारतील’ त्यामुळे त्यांनी २ ट्रिलियन डॉलरच्या अर्थसहाय्याची योजना अर्थव्यवस्थेसाठी बनवलीय. त्यांना अर्थव्यवस्थेचा ‘विषाणू’ लागलेला असल्याने कोरोना होण्याची शक्यता कमी आहे.
‘सामाजिक अंतर’ वाढवण्यावर सध्या जोर असला तरी सामाजिक माध्यमांवर प्रतिभा माहिती, कल्पनाविलास व भयतंत्र या सर्वांचाच विस्फोट झाला आहे. स्पेनमधले गल्लोगल्ली जाऊन जनतेचे मनोरंजन करू पाहणारे पोलीस, मुखवटे घालून गुढी उभारणारे मराठी दाम्पत्य, थाळी वाजवताना लोकांनी केलेले प्रताप असो सगळेच अद्भुत आहे. एका खेडूत बाईची कोरोनाला शिव्या देतानाची क्लिपिंगही मजेदार.
Leave a Reply